आज घरात निवांत असताना, अंगणात पडलेल्या धुळीला बघून माझ्या मनात विचार आला की कसं खेळलो ना आपण, ह्या मातीत, ह्या धुळीत. घातलेले कपडे आणि कपड्याच्या आतसुद्धा सगळं धुळीत माखायचं, पण खेळायची धुंदी कमी व्हायची नाही. विष अमृत, डोंगर का पाणी, विटी दांडू आणि कधी कधी क्रिकेट खेळायला कोणता व्हाट्सअॅप ग्रुप लागायचा नाही; नुसती हाक मारली की सगळी हजर. उन्ह वर चढायला लागली की कोणाच्यातरी घरात जायचं, कॅरमवर पावडर फासायची आणि अगदी हाताला कड येईपर्यंत कॅरम बोर्डवर नेम धरायचा. ज्याला क्वीन निघते त्याला कवर कधीच निघत नाही, असं म्हणायचं आणि ओम भगबुगे वगैरे मंत्र टाकायचे, समोरच्याला नेम चुकायला भाग पाडायचं. कॅरमचा डाव अगदीच जास्त खेचला गेला आणि बसून बसून पाय ओ म्हणायला लागले की बाहेर बघायचं आणि परत अंगणात दंगा करायला घुसायचं. तो चालायचा अगदी अंधार पडेपर्यंत, आणि कधीकधी अंधार पडल्यानंतरही. मग तीन-चार घरातल्या आया बाया आपली कार्टी त्या धुरकटलेल्या अंधारातून अचूक शोधून काढायच्या आणि पाठीत रपारप फटके देऊन घराकडे ओढत न्यायच्या. "अभ्यास करत जा की रे कधीतरी, परीक्षेत काय अंगावरची धूळ झटकून येणार काय?...